सफर मुंग्यांच्या विश्वाची

मिसा online ही एक वैचारिक आणि सामाजिक संवादाची जागा, आता नव्या रूपात आम्ही पुन्हा सुरू करत आहोत. काही काळ विश्रांतीनंतर, पर्यावरण दिनाच्या निमित्तानं प्रसिद्ध झालेल्या लेखाद्वारे या प्रवासाची नव्यानं सुरुवात झाली आहे. समाजातल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध पैलूंवर चिंतन, संवाद आणि लेखनासाठी ही जागा पुन्हा खुली करताना, तिचं मूळ ध्येय अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या नव्या पर्वात, वेबसाईटचं संपादन व व्यवस्थापन अधिक सशक्त करण्यासाठी आम्ही एक कार्यकारी संपादकीय मंडळ स्थापन केलं आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादक गीताली वि. मं. या मिसा online पोर्टलच्या पदसिद्ध संपादक आहेत. प्रा. शमा सुबोध सल्लागार संपादक तर दिक्षा दिंडे या कार्यकारी संपादक आहेत. तर अर्चना झेंडे आणि नितीन जाधव कार्यकारी सदस्य म्हणून मंडळात कार्यरत राहतील. आम्ही सर्व मिळून या मंचाला आशयपूर्ण, समावेशक आणि सामाजिकदृष्ट्या जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

त्याचबरोबर आपल्या सल्लागार मंडळात सुरेखा सुळे, उत्पल व. बा., लता प्र. म., संदीप सूर्यवंशी, केशव वाघमारे, लक्ष्मी यादव, वैशाली भांडवलकर आणि हिनाकौसर खान या मान्यवरांचा समावेश असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिसा online अधिक विचारप्रवृत्त, सशक्त आणि सामाजिकदृष्ट्या सजग बनत जाईल, अशी आम्हाला खात्री आहे.

या नव्या टप्प्यात आणखी एक महत्त्वाची पावलं उचलत, आपण मिसा online आता इंग्रजीतही सुरू करत आहोत, जेणेकरून हे माध्यम तरुणांपर्यंत आणि इंग्रजी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचवता येईल, तसेच व्यापक स्तरावर विचारांची देवाण-घेवाण घडवता येईल.

मिळून साऱ्याजणी मासिकाला तुम्ही जसा मनापासून प्रतिसाद दिला, तसाच प्रेमळ, विचारशील आणि सजग प्रतिसाद या नव्या डिजिटल पोर्टललाही मिळावा, हीच आमची मनापासूनची अपेक्षा!

शुभदा-चंद्रचूड

‘मूर्ती लहान पण कार्य महान’ असंच जिचं वर्णन केलं जाईल ती मुंगी आपल्या पृथ्वीतलावर जवळजवळ दीडशे दशलक्ष वर्षांपूर्वी अवतरली. शंभर दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर जसजशी फुलझाडं आणि फळझाडं उगवू लागली तसतशी मुंग्यांची संख्या भरमसाठ वाढू लागली. नंतरच्या अनेक कालखंडात पृथ्वीवरच्या अनेक भौगोलिक उलथापालथींनंतरही मुंग्यांनी त्यांचं अस्तित्व चिवटपणे टिकवून ठेवलं. आश्चर्य वाटेल पण आज जगभरात मुंग्यांच्या साडेबारा हजार प्रजाती शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहेत आणि अजून जवळजवळ दहा हजार प्रजातींचा शोध लागणं बाकी आहे असा शास्त्रज्ञांना अंदाज आहे. अशा रितीने आज अंटार्क्टिका वगळता जगभरात सर्वत्र या सहा पायांच्या कामसू कीटकांचा संचार आहे.

त्यांच्या छोट्याशा आकारामुळे आपल्याला जाणीव नाही, पण मुंग्या या जगातल्या सर्वाधिक कार्यमग्न असणाऱ्या कीटकांपैकी एक आहेत. मुंग्यांच्या जमिनीखालच्या काटेकोरपणे नियोजनबद्ध रितीने उभारलेल्या वस्त्या, त्यांची समूहाने एकजूटीने काम करण्याची वृत्ती, त्यांची शिस्तबद्धता या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे मुंग्या कायमच जगभरातल्या शास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय ठरल्या आहेत.

‘मित्र किडा फौंडेशन फॉर इन्सेक्ट रिसर्च अँड काँझरवेशन’ या संस्थेच्या संस्थापक, संचालक नूतन कर्णिक यांचा मुंग्या हाच अभ्यासविषय आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पृथ्वीतलाच्या पर्यावरण रक्षणात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विश्वाविषयी नूतन यांच्याकडून जाणून घेणं औचित्यपूर्ण ठरेल.

माझा जन्म आणि शिक्षण पुण्यामध्येच झालं. माझी आई बँक मॅनेजर होती, तर वडिलांचा केमिकल बिझिनेस होता. लहान बहीण गणितज्ज्ञ आहे. जरी आई-वडील व्यवसायात गुंतलेले होते तरीही त्यांनी आम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त इतर छंद जोपासण्याला नेहमीच प्रोत्साहन दिलं. माझ्या निसर्गनिरीक्षणाच्या आवडीला माझ्या आईने जोपासलं. सुरुवातीला पक्षीतज्ज्ञ श्री. किरण पुरंदरे यांच्याबरोबर मी निसर्गाचा अभ्यास केला. त्यांच्यासोबत खूप शिकायला मिळालं. मग हळूहळू लोकांना निसर्ग शिबिरांमधून माहिती देऊ लागले आणि निसर्ग अभ्यासाची माझी ओढ वाढली. मी एम. एस्सी. करत असताना मला खूप इच्छा होती की प्राण्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा. या क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध होत्या. अशातच बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये (IISC) पर्यावरण क्षेत्रात नावाजलेल्या ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ या डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर राघवेंद्र गदगकर यांच्या प्रयोगशाळेत सामाजिक कीटकांवर (मुंग्या, मधमाशा, गांधीलमाशा) संशोधन करण्याची संधी मिळाली आणि मला कीटकही आवडत असल्याने मी लगेच ती घेतली. IISC मध्ये मी सुरुवातीला गांधीलमाशांमधली समाजव्यवस्था कशी असते याचा चार वर्षे अभ्यास केला. त्यांची निरीक्षणं घेत असताना कधीतरी त्यांचा डंखही व्हायचा आणि मला त्या डंखाची ॲलर्जी यायला सुरुवात झाली. यावर तोडगा म्हणून प्रोफेसर गदगकरांनी सुचवल्याप्रमाणे मी मुंग्यांचा अभ्यास सुरू केला. मुंग्यांची सामाजिक व्यवस्था इतकी रंजक होती की मग मी पक्कं केलं की पुढे पण या अतिशय कमी माहिती असलेल्या मुंग्यांचा अभ्यास सुरू ठेवायचा. मुंग्यांची सामाजिक व्यवस्था हा खूप मोठा आणि गहन विषय आहे. मी त्यातील काही उपविभागांवर जवळपास वीस वर्षे संशोधन केलं.

गांधीलमाशांच्या अभ्यासातून एक मनोरंजक गोष्ट कळली की त्यांचं अन्न गोळा करण्याचे विशिष्ट तंत्र असतं आणि गांधीलमाशांच्या पोळ्यावर ती या अन्नाची देवाणघेवाण एका विशिष्ट पद्धतीने केली जाते. डावकामा नावाच्या मुंग्यांच्या विविध जातीच्या अभ्यासातून हे लक्षात आलं, की त्यांच्या मातृसत्ताक वसाहतींमध्ये राणी मुंगी स्वत:चं वर्चस्व कधी बळाचा वापर करून तर कधी रासायनिक गंधकणांचा वापर करून स्थापन करते. मुंग्यांच्या गुणसूत्रांचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा हे कळालं की त्यांच्या वर्तणुकीतल्या फरकांशी गुणसूत्रांचा संबंध असू शकतो.

आपल्या जीवसृष्टीचा जवळपास ७०टक्के भाग हा कीटक आहेत आणि हे कीटक आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ते पिकांचं परागीभवन करतात, नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण करतात आणि निसर्गातला बराचसा कचरा विघटन देखील करतात. त्यांचं महत्त्व समजून घेऊन आपण निसर्गाबद्दल अधिक जागरूक राहू शकतो. कीटकांचं अस्तित्व धोक्यात आलं तर आपलं अस्तित्वदेखील धोक्यात येऊ शकतं एवढं त्यांचं निसर्गामधील महत्त्व आहे आणि त्यांचं संरक्षण करायचं असेल तर आधी त्यांची माहिती घेणं, त्यांना समजून घेणं फार आवश्यक आहे.

मुंग्याच्या जवळपास १५००० प्रजाती जगभरात आहेत, तर भारतामध्ये ८८७ प्रजातींच्या मुंग्या सापडतात. आपलं घर, बगीच्यामध्ये ८ ते १० प्रजातींच्या मुंग्या सहज दिसू शकतात. अंटार्टिकासारखे अतिथंड हवामानाचे प्रदेश सोडता मुंग्यांचे खूप वेगवेगळे अधिवास आहेत. काही मुंग्या झाडांवर घरं बांधतात, तर काही जमिनीखाली, काही आपल्या घरांमध्ये, भिंतीच्या फटींमध्ये तर काही पालापाचोळ्यांमध्ये घरं करून राहतात. मुंग्या या सामाजिक कीटक आहेत. त्यांच्यामध्ये फक्त राणी मुंगी अंडी घालते तर बाकी सर्व कामकरी मुंग्या या अंडी न घालता वसाहतीमधील सर्व कामं करून राणी मुंगीला तिची प्रजा वाढवण्यासाठी मदत करतात. कामकरी मुंग्यांमध्ये लहान वयाच्या मुंग्या वसाहतीमध्ये थांबून अंडी, पिल्लांची काळजी घेणं, राणीची काळजी घेणं अशी कामं करतात. वयाने थोड्या मोठ्या मुंग्या वसाहतीमध्ये नवीन खोल्या बांधणं, वसाहतीच्या प्रवेशद्वारापाशी थांबून संरक्षण करणं अशी कामं करतात. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या बाहेरून जाऊन खाणं गोळा करून आणणं हे काम करतात.

मुंग्या दिवसभरात वेगवेगळी कामं करत असतात. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा तापमान कमी असतं तेव्हा काही मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडतात. काही मुंग्या वसाहतीच्या आतमध्ये राहून छोट्या अंड्यांची आणि राणीची काळजी घेणं, स्वच्छता राखणं, वसाहतीची डागडुजी करणं, वसाहतीचं संरक्षण करणं अशी कामं करत असतात. दिवसभर काम करून रात्री त्यांची हालचाल थोडी मंदावते आणि त्या विश्रांती घेतात.

मुंग्यांच्या खाण्यामध्ये खूप विविधता दिसून येते. त्या फुलांमधील मधुरस, साखर, स्वयंपाक घरातील अन्न असे पदार्थ खातातच, त्याबरोबरच जिवंत किंवा मेलेले कीटक, वाळवी, झाडांच्या बिया, कुजलेले पदार्थदेखील खातात. 

वसाहतीची सुरुवात करताना राणी मुंगी जमिनीमध्ये बिळ खोदून त्यामध्ये अंडी घालते. त्या अंड्यांमधून बाहेर येणारी पहिली पिढी जमिनीमध्ये अजून खोदकाम सुरू करते आणि वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या बांधायला लागते. मुंग्या त्यांचे जबडे वापरून खोदकाम करतात व माती बाहेर टाकतात. हळूहळू त्या आतमध्ये वेगवेगळी दालने, छोटे रस्ते बांधतात आणि वसाहत पूर्ण करतात.

काही जातीच्या मुंग्या आवाज करतात पण तो आपल्याला ऐकू येत नाही. मुंग्या त्यांच्या शरीराचे काही भाग विविध गोष्टींवर घासून हे आवाज एकमेकांशी संपर्क करायला काढतात. मुंग्या आसपासच्या परिस्थितीप्रमाणे समजून उमजून, साधे साधे नियम वापरून कामं करतात. एकमेकांबरोबर कुशाग्रतेने संवाद साधून, वसाहतीच्या गरजांप्रमाणे निर्णय घेऊन त्या सर्व कामे पार पाडतात. मुंग्या चालताना स्वत:च्या शरीरातील काही रासायनिक गंध कण दिशा दर्शवण्यासाठी जमिनीवर सोडत जातात. त्यांच्या मागून येणाऱ्या मुंग्या या गंध कणांचा मागोवा घेत त्यांच्यामागून चालतात. त्यामुळे त्यांची ओळ मोडली तरी या गंधकणांच्या साहाय्याने त्या पुन्हा एका ओळीमध्ये व्यवस्थित चालू शकतात. अशा शिस्तबद्ध पद्धतीने काम केल्यामुळे मुग्यांना अतिशय कार्यक्षमतेने सगळी कामे करता येतात. राणी मुंगीचं मुख्य काम अंडी घालणं हे असतं. ही एखाद्या यंत्राप्रमाणे सतत अंडी घालत राहते. राणी मुंगीच त्यांची वसाहत स्थापन करते आणि प्रजा वाढवायला अंडी घालते. तेच तिचं प्रमुख आणि एकमेव काम असतं. बाकी सगळ्या कामकरी मुंग्या असतात. वसाहतीचं कामकाज सौहार्दपूर्ण वातावरणात, एकजुटीने चालू राहील याची त्या दक्षता घेतात. राणीमुंगीची देखभाल करणं, अंड्यांची देखभाल करणं हे त्यांचंच काम असतं. सहसा कामकरी मुंग्या स्वत: अंडी घालत नाहीत. राणी मुंगीने घातलेल्या अंड्यांतून जन्मलेली प्रजा ही कामकरी मुंग्या म्हणूनच वाढते. थोडक्यात कामकरी मुंग्याच वसाहत चालवतात. एखाद्या मुंगीने कामकरी मुंगी व्हायचं की राणीमुंगी हे तिच्या गुणसूत्रांवरून ठरत नाही, तर कोणाला उत्तम प्रथिनयुक्त आहार मिळतो त्यावर ठरतं.

नर मुंग्याही असतात. त्यांना पंख असतात. नर मुंग्या फलित न झालेल्या अंड्यांपासून विकसित होतात. राणी मुंगीला फलित करणं एवढंच त्यांचं एकमेव काम असतं. जन्मानंतर काही दिवसातच ते दुसऱ्या वसाहतीतील राण्यांबरोबर मिलन करण्यासाठी निघून जातात. आपण बघतो त्या सगळ्या मुंग्या सहसा मादी मुंग्याअसतात. 

एखादी मुंगी कुठल्या जातीची/ प्रकारची आहे आणि ती वसाहतीमध्ये काय स्वरूपाचं काम करते यावर तिची आयुष्यमान असतं. पण सर्वसाधारणपणे कामकरी मुंग्या काही महिने ते २-३ वर्षे जगतात. राणीमुंगी १०-२० वर्षे जगते. माणसांप्रमाणेच मुंग्यांच्याही पिढ्या असतात आणि एका वेळी, एका वसाहतीमध्ये २ ते ३ पिढ्या एकत्र राहताना दिसून येतात.

मुंग्यांची घरं जमिनीखाली खोल असली तरी जमिनीवरती मोठ्ठी वारूळं भारतामधील मुंग्या बांधत नाहीत. आपल्याकडे जंगलांमध्ये दिसणारी मोठी मातीची वारुळं ही वाळवीने बांधलेली असतात.

काही मुंग्याच विषारी असतात. पण मुंग्यांचं विष हे प्रामुख्याने त्यांच्या भक्ष्याला मारण्यासाठी किंवा भक्षकापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी असतं. मुंग्या जेव्हा दंश करतात तेव्हा त्या फॉर्मिक ॲसिड सोडतात ज्यामुळे आपल्याला थोड्या वेदना होतात. पण भारतामध्ये तरी आपल्या धोकादायक ठरतील अशा विषारी मुंग्या नाहीत.

लिंबाचा रस, व्हिनेगर, बोरिक पावडर वापरून मुंग्यांना लांब ठेवता येतं. ग्लिसरीन, टाल्कम पावडर सुद्धा त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर टाकली तर काही अंशी त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. 

मुंग्या ओलावा, खाद्य, पाण्याच्या शोधात घरांजवळ येतात. त्यामुळे त्यांना पूर्णपणे रोखणं अवघड असतं. पण स्वयंपाकघरामध्ये जास्त स्वच्छता ठेवणं, भिंतीमधील फटी बुजवणं किंवा बाहेरून घराला स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या कायम घरापासून लांब ठेवणं अशा गोष्टी करून मुंग्यांना सहज प्रवेशाला अडथळा करता येतो. 

मुंग्या आपल्या शेतीवर आलेल्या किड्यांना खाऊन नैसर्गिक कीटकनाशकांचं काम करतात. तसंच कुजलेले प्राणी खाऊन जंगलं, निसर्ग स्वच्छ ठेवतात. बरेच पक्षी आणि प्राणी मुंग्यांना खातात. मुंग्यांची बीज प्रसारात पण मदत होते. जमिनीखालच्या त्यांच्या हालचालीतून माती वरखाली होते. हवा खेळती राहते, त्याचा पिकांना फायदा होतो. मातीचा कस सुधारतो. त्यामुळे मुंग्यांची निसर्गातील भूमिका खूप महत्त्वाची आहे.

माझ्या संशोधनाचा उपयोग हा मुंग्यांच्या उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये आहे. तसंच त्यांच्या वर्तणुकीवरून निघालेले निष्कर्ष माणसांची समाजव्यवस्था, माणसांमधील व्यवस्थापन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये वापरले जाऊ शकतात.

मी आणि कीटकतज्ज्ञ डॉ. राहुल मराठे यांनी २०२३ मध्ये ‘मित्रकिडा फाऊंडेशन’ स्थापन केलं. आमच्या संस्थेचं नावच ‘मित्रकिडा’आहे. कारण कीटक आपले शत्रू नसून मित्र आहेत आणि ‘मित्रकिडा’ स्थापनेमागचा उद्देश हा आहे की लोकांच्या मनातले कीटकांबद्दलचे गैरसमज आणि भीती दूर करून कीटकांचे आपल्याला आणि निसर्गाला होणारे फायदे हे लोकांना सांगून कीटक संरक्षण आणि संवर्धन करायचं. संस्थेतर्फे आम्ही कीटकांविषयीची माहितीपर शास्त्रीय व्याख्यानं देतो, कीटक शिबिरं घेतो, लोकांना निसर्गामध्ये नेऊन कीटक परिचय करून देतो, वृत्तपत्रांमधून लिखाण करतो आणि कीटकांबद्दल काही समस्या असेल तर त्याविषयी सल्लाही देतो. कीटक सवर्धन व्हावं म्हणून आम्ही फुलपाखरू उद्यान स्थापन करणं, कीटकांचं सर्वेक्षण करणं आणि मित्रकीटक वाढवून निसर्गामध्ये सोडणं हेही करतो. मुंग्यांबद्दल, त्यांच्या निसर्गातील स्थानाबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी असं मला वाटतं आणि त्यामुळे मी आत्तापर्यंत मुंग्यांवर अनेक व्याख्याने दिली आहेत.

भारतातील बऱ्याच विद्यापीठांमधून आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमधून विशिष्ट कीटकांवर अभ्यास केले जात आहेत. उदा. National Bureau of Agricultural Insect Resources (NBAIR), Bengaluru, Zoological Survey of India (ZSI), Kolkata and Regional Centres, Indian Institute of Science, Bengaluru. जगभरात वेगवेगळ्या कीटकांवरती प्रचंड संशोधन झालं आहे आणि कीटकांपासून प्रेरणा घेऊन नवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. तापमान वाढीचा आणि हवामान बदलाचा कीटकांवर होणारा परिणाम अभ्यासणं हे आमचं उद्दिष्ट आहे.

मित्रकिडा फाऊंडेशनचं काम खूप वाढत असल्याने माझे व्यक्तिगत उपक्रम वेगळे राहिले नाहीयेत. माझा सर्व वेळ कीटकांचा अभ्यास आणि माहितीचा प्रसार करण्यात जातो.

आपल्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून नूतन यांना जाणवलेलं मुंग्यांचं विश्व सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्या व्याख्यानं देतात, शास्त्रीय लिखाण करतात. त्यांच्या ‘मित्रकिडा फाऊंडेशन’ तर्फे कीटक संरक्षण आणि संवर्धन करण्याकरता त्या सतत कार्यरत आहेत.

त्यांच्या या कामाची योग्य दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी संस्थेचा ‘ग्रीन वॉरिअर २०२४’ पुरस्कार, ‘वसुंधरा मित्र निसर्गरक्षक पुरस्कार २०२४’, डॉ. कल्पना चावला स्मृती यशस्विनी पुरस्कार २०२४’ हे त्यापैकी काही!

नूतन यांच्या आणि ‘मित्रकिडा’ या त्यांच्या संस्थेच्या वाटचालीला ‘मिळून साऱ्याजणी’ तर्फे शुभेच्छा!

मुंग्यांची काही खास वैशिष्ट्यं 

मुंग्या स्वत:च्या भरण पोषणाकरता जसं अन्न खातात, तसंच वसाहतीतल्या इतर सभासदांना लाळेच्या रूपांतून वाटण्याकरताही खातात. त्याकरता खाल्लेलं अन्न त्या परत तोंडात आणून एकमेकींसोबत वाटून खातात. या अर्थाने मुंग्यांना वैयक्तिक आणि सामाजिक अशी दोन पोटं असतात असं म्हणावं लागेल. मुंग्यांना कान नसतात. पण त्यांच्या सहा पायांच्या साहाय्याने जमिनीवरच्या ध्वनीकंपनं त्या सहज समजून घेऊ शकतात. मुंग्यांच्या छोट्याशा आकारामुळे आणि ऑक्सिजनच्या त्यांच्या मर्यादित गरजेमुळे त्यांच्या शरीरात फुफ्फुसं नसतात. त्यांच्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं आणि खेळवण्याचं काम त्यांच्या शरीरातल्या नळ्यांचं जाळं करतं. आपल्या शरीरात ऑक्सिजन साठवून ठेवण्याची मुंग्यांची क्षमता असाधारण आहे. त्यामुळेच पाण्यात पूर्ण बुडूनही त्या जवळ जवळ चोवीस तास जिवंत राहू शकतात. दीडशे फॅरनहीट तापमानापर्यंत मुंग्या पाण्यात जिवंत राहू शकतात. मुंग्या आपल्या अदृश्य पाऊलखुणा त्यांच्या शरीरातील एका रसायनाद्वारे त्या जिथे जिथे जातील तिथे तिथे सोडतात. या पाऊलखुणांद्वारा मुंग्या अन्नाचे स्रोत धोक्याच्या सूचना, वहिवाटीची वाट इत्यादी अनेक गोष्टींबद्दलची उपयुक्त माहिती इतर सभासदांना देतात.

 मुंग्यांकडून शिकावं असं काही

त्यांचा आकार छोटा असला तरी मुंग्या बौद्धिक कौशल्यात आघाडीवर आहेत. म्हणूनच एक सामाजिक आणि अत्यंत नियोजनबद्ध रितीने जगणारा कीटक म्हणून त्या ओळखल्या जातात. मार्गात येणाऱ्या अडथळ्यानंतर मात करणं, अन्नाचे नवनवे स्रोत, साठे शोधून काढणं, चुकांमधून शिकणं, अनुभवातून शहाणं होणं, इतकंच काय पण प्रसंगी अभिनव धोरण आखणं अशा अनेक डोकेबाज गोष्टी मुंग्यांना अवगत असतात. परिसरातील बदलांशी मुंग्या चटकन जुळवून घेतात आणि म्हणूनच त्या कुठल्याही परिस्थितीत तग धरून राहतात. एकमेकांशी सुसंगत रीतीने जुळवून घेत एकजुटीने-सहकार्याने काम करत मुंग्या आपलं एकत्रित ध्येय साध्य करतात. त्यांच्या या कार्यपद्धतीत एकमेकांशी स्पर्धा करण्याला अजिबात स्थान नाही. ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे त्यांचं धोरण असतं.

मुलाखत आणि शब्दांकन: शुभदा चंद्रचूड, पुणे

smcmrc@gmail.com